मुंबई : नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाबाबत जो पर्यंत स्पष्टता येणार नाही, तो पर्यंत विधेयकाला पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली. शिवसेनेनं लोकसभेत या विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं याचं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आज मंगळवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.
उध्दव ठाकरे म्हणाले, सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं मतदान करणं ही देशभक्ती आहे आणि त्यांच्या विरोधात मतदान करणं हा देशद्रोह आहे, ही मानसिकता बदलायला हवी. या सर्वांपेक्षा देशात राहणाऱ्या जनतेसमोरचे रोजच्या जीवनातील आवश्यक प्रश्न सोडवणं अधिक महत्त्वाचं आहे. आम्ही काय भूमिका घ्यावी, हे आम्हाला कोणी सांगू नये, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
आमच्यासारखे सर्व पक्ष देशहित डोळ्यासमोर ठेवून काम करतील. या विधेयकाबाबत अधिक स्पष्टता येणं आवश्यक आहे. राज्यसभेत हे विधेयक मांडलं जाण्यापूर्वी त्यामध्ये सुचवलेल्या सुचनांची दखल घेणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. तसंच अधिक स्पष्टता येत नाही तोवर राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूनं मतदान करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आमच्या लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांशी बोलूनच मी निर्णय घेणार आहे. असेही उध्दव ठाकरे म्हणाले.