नवी दिल्ली : देशभरात एनआरसीवरून उलटसूलट चर्चा सुरु आहे. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या (एनआरसी) मुद्द्यावरून विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना आज, बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत उत्तर दिले. धर्माच्या आधारे एनआरसीमध्ये भेदभाव होण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. एनआरसीच्या आधारे नागरिकत्व सुनिश्चित केले जाईल आणि ते संपूर्ण देशात लागू करण्यात येईल, असं शहा यांनी सांगितलं.
कोणत्याही धर्माच्या नागरिकांना यामुळं घाबरण्याचं कारण नाही. देशातील सर्वच नागरिकांना एनआरसी यादीत स्थान देण्यासाठीची ही एक प्रक्रिया आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ‘एनआरसी’मध्ये धर्माच्या आधारे भेदभाव केला जाणार नाही. अन्य धर्माच्या लोकांना यादीत स्थान दिलं जाणार नाही, अशी कोणतीही तरतूद एनआरसीमध्ये नाही. सर्व नागरिक, मग त्यांचा धर्म कोणताही असो, त्यांना या यादीत स्थान दिलं जाऊ शकतं. एनआरसी ही स्वतंत्र प्रक्रिया आहे आणि नागरिकत्व सुधारणा विधेयक ही वेगळी प्रक्रिया आहे,’ असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं. देशातील सर्व नागरिकांना एनआरसी यादीत स्थान मिळावं यासाठी ते संपूर्ण देशात लागू केले जाणार आहे, असंही त्यांनी सांगितले.