नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. सोमवारपासून १० दिवसात चार खटल्यांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामध्ये अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच्या मालकीचा खटला, राफेल खरेदी घोटाळा, शबरीमाला मदिर महिला प्रवेश, माहिती अधिकारचा समावेश आहे. चारही निकाल सरन्यायाधीश गोगोई सुनावणार आहेत. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच्या मालकीचा खटला हा या चार खटल्यांतील सर्वाधिक चर्चेतील खटला आहे. या खटल्याच्या निकालाबाबत उत्सुकता आहे. न्या. गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठ या खटल्याचा निकाल देईल. हा निकाल एकमताने होतो, की त्याबाबत खंडपीठात दुमत होते, याकडेही सगळ्यांचे लक्ष आहे.
केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना मुक्त प्रवेश देण्यासंदर्भातील याचिकांवरील निवाडाही या १० दिवसांत अपेक्षित आहे. सर्व वयोगटातील सर्व महिलांना मंदिरात मुक्त प्रवेश देण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानेच २८ सप्टेंबर रोजी दिला होता. त्यावर दाखल ५०पेक्षा अधिक याचिकांवरील निकाल न्या. गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ देईल.
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदी कराराचा मुद्दा प्रचारात जोरकसपणे लावून धरला होता. या व्यवहारात भ्रष्टाचार झाला असून, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीच त्यात सहभागी आहेत, असा त्यांचा दावा होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्या प्रकरणात मोदी सरकारला क्लीन चिट दिली. त्याबाबत दाखल याचिकेवर न्या. गोगोई निकाल देतील.
सरन्यायाधीशांचे कार्यालय माहिती अधिकाराच्या कक्षेत आणण्याच्या मुद्द्यावरील निकालही या दहा दिवसांत दिला जाईल. यामुळे सर्वांच्याच नजरा या निकालांकडे लागल्या आहेत.