मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची बैठक मुंबईत झाली. यावेळी अजित पवार यांनी मार्गदर्शन करत असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी अजित पवारांना एसएमएस पाठविला. त्या एसएमएसमध्ये ‘मी संजय राऊत’,… जय महाराष्ट्र! एवढाच उल्लेख आहे. अशी माहिती पवारांनी माध्यमांशी बोलताना दिली.
अजित पवार यांनी सांगितले, संजय राऊत यांनी निवडणुकांनंतर प्रथमच एसएमएस केला आहे. संजय राऊत हे मोठे खासदार आहेत. मी त्यांचा सन्मान करतो. त्यांना मी फोन करेल. काय काम आहे, विचारेलं. एकमेकांशी काम असतातं. असंही अजित पवार म्हणाले.
दुसरीकडे, विरोधी पक्षात बसण्याचा कौल जनतेने महाआघाडीला दिलेला आहे. समोरच्यांनी सरकार स्थापन करावी याची आम्ही वाट पाहतोय, असंही अजित पवार म्हणाले. शरद पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु आहे, ती शक्यता मात्र अजित पवार यांनी फेटाळली आहे. शरद पवार मुख्यमंत्री होण्याची सुतराम शक्यता नसल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, अजित पवारांनी या बैठकीत राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या आणि पराभूत झालेल्याही आमदारांना, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. तसंच काठावरच्या नेत्यांना इशाराही दिला. ते म्हणाले, ‘ज्या कुणाला पक्ष सोडून जायचा असेल त्यांनी आताच जावे.’ जे लोक पक्ष सोडून गेले त्यांचं ‘येऊ का येऊ का’ सुरू असेल असंही त्यांनी सांगितलं.