नाशिक : शिवसेना भाजपच्या सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, भाजपाचं नेते गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये युतीचा तिढा नऊ तारखेला सुटणार असल्याचा दावा केला आहे.
अवकाळी पावसाचा महाराष्ट्राला फटका शेतीला बसला. यामुळे नाशिक जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गिरीश महाजन दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना महाजन म्हणाले, सरकार स्थापनेविषयी नऊ नोव्हेंबरपर्यंत कालावधी आहे. त्यामुळे फारशी काळजी करण्याचं कारण नाही. ९ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेत्यांची बैठक होईल. त्या बैठकीत निश्चितपणे तोडगा निघेल. कोणताही वाद राहणार नाही. सरकार स्थापनेचा निर्णयही तेव्हाच होईल,” असा दावा त्यांनी केला. यामुळे युतीमध्ये फाटाफूट होणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे.