मुंबई : रिझर्व्ह बँकेने मुंबईतील पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले. बँकेने एसएमएस ग्राहकांना पाठवले आहेत. या मेसेजेसनंतर पीएमसी बँकेबाहेर ग्राहकांच्या पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या आहेत. या प्रकारामुळे मुंबईसह नवी मुंबईतील शाखांवर ग्राहाकांनी गोंधळ घातला असून, त्यांच्या मनात घबराट निर्माण झाली आहे.
आरबीआयने निर्बंध लागल्याने पीएमसी बँकेला आर्थिक देणी-घेणी करताना मर्यादा येणार आहेत. नवी कर्जे देणे, नव्या ठेवी स्वीकारणे, खातेधारकांचे पैसे भागवणे यावर निर्बंध आहेत. बँकेने आज सकाळपासून तसे मेसेज पाठवले. यामुळे मुंबई, नवी मुंबईतील शाखांवर ग्राहाकांनी एकच गर्दी केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. भारतात पंजाब आणि महाराष्ट्र बँकेच्या 6 राज्यात शाखा आहेत. त्या सर्व शाखांबाहेर आता गर्दी होत आहे.
खातेदारांवर हे घातले निर्बंध?
1.एका खातेधारकाला एका खात्यातून केवळ 1 हजार रुपयेच काढता येतील.
2. 6 महिन्यात केवळ 6 हजार रुपयेच काढता येतील.
3. तुमच्या खात्यात कितीही रक्कम असली तरी महिन्यातून केवळ 1 हजार रुपयेच काढता येतील.
4. जर तुम्ही पीएमसी बँकेचं कर्ज घेतलं असेल, तर तुमच्या हप्त्याची रक्कम खात्यात वळती होईल
5. कर्ज फेडण्यासाठी कर्जदार त्यांच्या ठेवींचा वापर करू शकतात.
बँकेवर कोणकोणते निर्बंध?
1. रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देता येणार नाही
2. जुन्या कर्जांचे नूतनीकरण करता येणार नाही
3. बँकेला कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही
4. नव्या ठेवी स्वीकारता येणार नाहीत
5. बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करता येणार नाही
6. कर्मचाऱ्यांचे पगार, जागेचे भाडे, कर, विज बिल, प्रिंटिंग, स्टेशनरी, कायदेशीर खर्च यासाठी खर्च करता येईल
7. वकिलांना प्रत्येक खटल्यामध्ये पाच हजारापेक्षा अधिक रक्कम देता येणार नाही
8. रिझर्व्ह बँकेने जे निर्बंध घातले आहेत, त्याची माहिती प्रत्येक ठेवीदाराला देणे बंधनकारक आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेला दिली आहे.