मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा व त्याअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या संभाव्य राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) च्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज गुरुवारी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सीएए व एनआरसी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचा डाव आहे. हा डाव केवळ मुस्लिमांच्या विरोधात आहे असं नाही, तर ४० टक्के हिंदूंच्याही विरोधात आहे. आजही देशातील अनेकांचे संसार गाढवाच्या पाठीवर आहेत. अशीही जोरदार टीका आंबेडकर यांनी केली आहे.
सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व एनआरसीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीनं आज गुरुवारी दादर येथे धरणं आंदोलन झालं. यावेळी आंबेडकर म्हणाले, ‘आजोबा, बाप कुठं मेला हे ज्यांना माहीत नाही, त्यांच्याकडं कागदपत्रं मागता काय,’ असा सवाल आंबेडकर यांनी केला. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचा डाव आहे. हा डाव केवळ मुस्लिमांच्या विरोधात आहे असं नाही, तर ४० टक्के हिंदूंच्याही विरोधात आहे. आजही देशातील अनेकांचे संसार गाढवाच्या पाठीवर आहेत. त्यांच्याकडं कसलेही पुरावे नाहीत. बाप कुठं मेला? आजोबा कुठं मेला? हेही अनेकांना माहीत नाही. त्यांच्याकडून नागरिकत्वाचे पुरावे मागितले जाणार आहेत. हा अन्याय आहे. विचारपूर्वक केलेल्या या कायद्याला संघर्षानं उत्तर द्यावं लागणार आहे.
डिटेन्शन कॅम्प पाडून टाकू…
छावण्या (डिटेन्शन कॅम्प) बांधल्या तर त्या आम्ही पाडून टाकू असा इशारा आंबेडकर यांनी यावेळी केंद्र सरकराला दिला. हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येऊन हा लढा लढायला हवा. डिटेन्शन कॅम्पमध्ये जायचं नसेल तर या सरकारविरोधात आवाज उठवा. हे सरकार पाडा,’ असं आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केलं.