मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार ३० डिसेंबरला होणार आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारानंतर होणारा शपथविधीचा कार्यक्रम दुपारी दोन वाजेच्या आत उरकण्याची सूचना राजभवनाकडून सरकारला देण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती. यामुळे चर्चेला उत आला होता. परंतु, शपथविधीच्या कार्यक्रमाबाबत राजभवनाकडून स्पष्टीकरण करण्यात आले आहे.
30 डिसेंबराला होणारा शपथविधीचा कार्यक्रम दुपारी दोन वाजेच्या आत उरकण्याची कोणतीही तोंडी अथवा लेखी सूचना राज्य सरकारला केली नाही. असं पत्रक राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी काढले आहे. त्यामुळे सर्व चर्चांमध्ये कोणतेही सत्य नव्हते हे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे. अखेर मुहूर्त मिळालं असून सोमवारी विस्तार होणार आहे. यामध्ये कोणकोणत्या नेत्याला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसमुळे विस्तार रखडला अशीही चर्चा सुरु होती. विरोधकांनीही महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये ताळमेळ नसल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असल्याचा आरोप केला होता. मात्र या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार आणि कुणाला हुलकावणी याचीच सर्वांना उत्सुकता लागलेली आहे.