मुंबई : भाजप सरकारच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचे दूरध्वनी टॅप झाल्याबाबतची माहिती गंभीर आहे. सत्तेसाठी भाजप कोणत्याही पातळीला जाऊ शकते, याबाबत मला काहीही शंका नसून, या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी सखोल उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, निरंकूश व अखंड सत्ता हाच भाजपचा एकमेव अजेंडा राहिलेला आहे. सत्ता टिकवण्यासाठी भारतीय जनता पक्ष नैतिकता, नियम, संकेत, परंपरा सारे धाब्यावर बसवून काहीही करू शकते, हे महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्या सरकारच्या काळात इतर पक्षांच्या नेत्यांचे दूरध्वनी टॅप झाल्यासंदर्भातील आरोपांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यात तथ्य असण्याची दाट शक्यता असून, या आरोपांची मुख्यमंत्र्यांनी सखोल उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.