मुंबई : तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारनं राज्यातील महत्वाच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले असा आरोप करण्यात आहे. यावरून बोलताना माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राज्य सरकारने तसे कुठलेही आदेश दिलेले नव्हते असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. राज्य सरकारला ज्या कोणत्या यंत्रणेमार्फत चौकशी करायची असेल, ती करायला ते मोकळे आहेत असंही ते म्हणाले आहेत.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अनेक बड्या व्यक्तींचे फोन टॅप झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकरणात ज्यांनी तक्रार केली आहे, त्यांची राजकारणातील विश्वसनीयता ही संपूर्ण देशाला ठाऊक आहे. राज्य सरकारला ज्या कोणत्या यंत्रणेमार्फत चौकशी करायची असेल, ती करायला ते मोकळे आहेत. सत्य महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊक आहे. शिवसेनेचे मंत्रीसुद्धा त्या काळात गृहराज्यमंत्री होतेच. माझी एकच विनंती आहे की, तात्काळ चौकशी करून त्याचा अहवाल राज्याच्या जनतेपुढे ठेवावा. इस्त्रायलला जाऊन चौकशी करायची असेल तर तीही करावी.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही बड्या नेत्यांचे फोन आणि व्हॉट्सअॅप टॅप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनीही माध्यमांसमोर काही आरोप केले होते. त्यानंतर आता याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.