नवी दिल्ली : देशभरात थंडीचा कहर सुरु आहे. उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातील अनेक भागात थंडीचा कहर सुरूच आहे. उत्तर प्रदेशात कडाक्याच्या थंडीमुळे आतापर्यत ४१ जणांचा कुडकुडू बळी गेला आहे.
थंडीमुळे कानपूर, उन्नाव व जालौन परिसराला अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. कानपूरमध्ये वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कडाक्याची थंडी आणि धुक्यामुळे रेल्वे तसेच विमानसेवेला फटका बसला आहे. जनजीवनही विस्कळीत झाले आहे.
कानपूर शहरांत १७, कानपूर ग्रामीणमध्ये ५, झांसीत ४, बांदात व महोबामध्ये प्रत्येकी ३, हातरस, आग्रा, हमीरपूरमध्ये प्रत्येकी २, कन्नौज, चित्रकूट व अलीगडमध्ये प्रत्येकी १ जणाचा मृत्यू झाला आहे. वीज कोसळून कानपूरमधील नौबस्ता व कलक्टरगंज परिसरात दोघांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील अनेक भागात हवामान बदलल्याचे वारे वाहत आहेत. काही ठिकाणी पारा खाली घसरला आहे. इटावात ४.८ डिग्री, बांदात ५.४ डिग्रीसह सर्वात जास्त थंडीची नोंद करण्यात आली. शुक्रवारी काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर प्रदेशात थंडी पडली असून काल सायंकाळी कानपूर, उन्नाव व जालौनमध्ये अवकाळी पाऊस पडला. हवामान बदलामुळे उच्च रक्तदाब रुग्णांना मोठा फटका बसला.
महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढला…
दुसरीकडे, महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ परिसराला शुक्रवारी सकाळी पूर्णपणे दाट धुक्याने वेढले होते. गेल्या काही दिवसापासून थंडीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. परिणामी धुक्याचे प्रमाणही आधिक वाढले आहे. पहाटेच्या सुमारास पुणे-मुंबई एक्सप्रेस वे धुक्यात हरवला होता. अगदी काही अंतरावरचे वाहने दिसत नसल्याने पार्किंग लाइट सुरू ठेवून वाहनचालकांना धीम्या गतीने धुक्यातून वाट काढवी लागली. त्यामुळे एक्स्प्रेस वेवरील वाहनांचा वेग पूर्णपणे मंदावला होता. कोणतीही दुर्घटना होऊ नये, म्हणून वाहन चालकांना काळजी घेण्याचे आवाहन महामार्ग वाहतूक पोलिसांनी केले आहे.