मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासाठी आज मातोश्री निवासस्थानी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मातोश्री निवासस्थानी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
सत्तास्थापन्यापूर्वी शिवसेना आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यामध्ये खटके उडाले होते. मात्र महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्यपालांमध्ये दिलजमाई झाली असल्याचे आता दिसून येतं आहे. राज्यपाल हे भाजपच्या इशा-यावर काम करतात अशी टीका त्यांच्यावर झाली होती. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्यपालांच्या काळ्या टोपीवरून ट्विटरवरून जोरदार टीकाही केली होती.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिवशी काँग्रेस नेते के.सी.पाडवी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेत असतांना राज्यपाल संतापले होते. पुन्हा शपथ वाचा असं खडसावून सांगितलं होतं. त्यानंतर राज्यपालांवर पुन्हा जोरदार टीका झाली होती. मात्र आजच्या मातोश्रीवरील स्नेहभोजनानंतर महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमधील कटूता संपणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.