मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माते ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर रंगभूमीवर २५ वर्षांनी पुनरागमन करण्यास सज्ज आहेत. हिंदी नाटक ‘कसूर’ मधून तब्बल २५ वर्षानंतर रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत.
अमोल पालेकर २४ नोव्हेंबर रोजी वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करणार असून याच दिवशी टाटा थिएटर, एनसीपीए, मुबंईमध्ये या नाटकाच्या शोचा प्रीमियर होणार आहे. ‘कसूर’ या नाटकाची निर्मिती जे.एस.डब्ल्यू आणि अनान यांनी एकत्रितरित्या केली असून नाटकाचं दिग्दर्शन संध्या गोखले आणि अमोल पालेकर यांनी केलं आहे. विशेष म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने अमोल पालेकर तब्बल २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगमंचावर वावरतांना दिसणार आहे. या नाटकामध्ये पालेकर मुख्य भूमिकेत झळकणार असून ते सेवानिवृत्त एसीपी दंवडते यांची व्यक्तीरेखा साकारणार आहेत.
अमोल पालेकर म्हणाले, कलाकार म्हणून या वयामध्ये ही भूमिका निभावणं आव्हानात्मक आहे. कारण, या पात्रासाठी जबरदस्त भावनात्मक आणि शारीरिक ऊर्जेची आवश्यकता आहे. वेगाने पुढे जाणारी ही कथा अचानक वळण घेत असल्याने, नाटक पाहताना तुम्ही केलेला विचार चुकीचा ठरतो. गंभीर विषयामुळे पडदा पडल्यानंतरही हे नाटक प्रेक्षकांच्या मनात घोळत राहिल” असं पालेकर म्हणाले.