हिंदी आणि पंजाबी चित्रपटसृष्टीत आपल्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सुरवीन चावला चांगलीच अडचणीत सापडली आहे. सुरवीन आणि तिचा पती अक्षय ठक्कर या दोघांवरही एका व्यावसायिकाला तब्बल ४० लाखांचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात आला आहे.
होशियारपूर पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात सत्यपाल गुप्ता या व्यावसायिकाने एफआयआर दाखल केली आहे. ज्यामध्ये त्यांनी सुरवीन चावला, तिचा पती अक्षय ठक्कर आणि भाऊ मनविंदर सिंग यांच्यावर आपल्याला ४० लाखांचा गंडा घातल्याचा आरोप केला आहे. त्याच्या तक्रारीनंतर या तिघांवरही भारतीय दंडसंविधानाच्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळत आहे.
तक्रारकर्त्या सत्यपाल यांच्या म्हणण्यानुसार ‘नील बट्टे सन्नाटा’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी या तिघांनीही त्याच्याकडून ४० लाख रुपयांची रक्कम घेतली होती. त्या बदल्यात त्याला या रकमेसोबतच ३० लाख रुपये निव्वळ नफा देण्याची हमीही दिली होती. पण, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र या तिघांनीही सत्यपालचे फोन उचलणं बंद केलं. मुख्य म्हणजे सुरुवातीला गुप्ता यांच्याकडून ५१ लाख रुपये या चित्रपटात गुंतवण्यात येणार होते. पण, काही तांत्रिक बिघाडामुळे फक्त ४० लाखांचीच रक्कम ट्रांसफर होऊ शकली. दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि गाजलाही. पण, त्यानंतर मात्र सुरवीन, तिचा पती आणि भाऊ या तिघांनीही गुप्ता यांच्याशी असलेले संपर्क तोडले. या प्रकरणानंतर सत्यपाल यांना ही रक्कम परत मिळालीच नाही. त्यामुळे अखेर त्यांनी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला.