अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करून युद्धाच्या माध्यमातून जग जिंकता येत नसून या जागतिकीकरणाच्या आधुनिक युगात जगाला कौशल्याच्या आधारे जिंकता येते. त्याकरिता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांना कौशल्याधारित रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता विविध योजना सुरू केलेल्या आहे. त्याचा लाभ घ्यावा तसेच जिल्ह्यातील युवकांनी उद्योगांमध्ये पुढाकार घेऊन प्रथम क्रमांकाचा जिल्हा बनवावा, असे राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित युवाशक्तीला आवाहन केले. प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात 15 जुलै रोजी जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आयोजित जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक राहुल पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा नियोजन अधिकारी नरेश उगेमुगे, राहुल ठाकरे, जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक उद्धव येरमे, उद्योजकता विकास अधिकारी भाग्यश्री वाघमारे उपस्थित होते.