मुंबई : कमला मिलमधल्या अग्नितांडवावरचे आरोप-प्रत्यारोप अजूनही चालू आहेत. आता पुन्हा एकदा संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय, गेल्या २० दिवसांत मुंबईमध्ये आगीमुळे ३१ लोकांना जीव गमवावा लागला. मुंबई आगीच्या विळख्यात सापडली आहे. महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे आणखी दुर्घटना होण्याची भीती आहे. पण मुख्यमंत्री मात्र आयुक्तांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत.‘
Is Mumbai in a fire trap? 31 #Mumbaikars died in last 20 days due to fire.Many more disasters r waiting to happen bcoz of #BMC‘s criminal negligence. But CM @Dev_Fadnavis is hell-bent to protect incompetent Commissioner Mehta.
Why? Only God knows.— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) January 9, 2018
काही दिवसांपूर्वी कमला मिल आग दुर्घटनेनंतर दोषी हॉटेलमालकाविरोधातली कारवाई थांबवण्यासाठी एका नेत्यानेच फोन करून दबाव आणल्याचा खळबळजनक आरोप बीएमसीचे आयुक्त अजॉय मेहता यांनी केलाय. विशेष म्हणजे पालिका सभागृहातच त्यांनी हा गंभीर आरोप केल्याने कमला मिल आग दुर्घटनेचं गांभीर्य आणखीनच वाढलंय. अर्थात आयुक्तांनी या नेत्याचं नाव घेणं टाळलं असलं तरी हॉटेलमालकावरील कारवाई थांबवण्यासाठी थेट पालिका आयुक्तांवर दबाव टाकणारा ‘तो’ नेता कोण ? याचीच चर्चा बीएमसी पालिका वर्तुळात सुरू झालीय. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे नेते संदीप देशपांडे सगळ्यांनीच आयुक्तांनी नेत्याचं नाव सांगावं असं म्हटलं. आता संजय निरुपम यांच्या ट्विटनं वादाला वेगळं वळण प्राप्त होतंय की काय असं वाटतंय.