चंद्रपूर: राज्यातील सेना-भाजप सरकार हे शेतक-यांचे सरकार नसून हे अदानी अंबानींचे सरकार आहे. मोजक्याच व्यवसायिकांचे हितसंबंध जोपासणारे हे सरकार असल्याची घणाघाती टीका अखिल भारतीय किसान सेलचे अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी केली.
काँग्रेसची महापर्दाफाश यात्रेदरम्यान चंद्रपूर येथे पटोले यांनी ही टीका केली. भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही महापर्दाफाश यात्रा सुरू केली आहे. व राज्यातील सरकारे ही अदानी, अंबानी यांच्या सेवेसाठी काम करत आहे. या दोघांना मोठे करण्यासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लुटले जात आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना ही सर्रास कंपनीच्या हिताची आहे, काँग्रेसच्या काळात हा विमा सरकारी बँक काढत असे, मात्र आता या खाजगी विमा कंपन्यांनी एकाही शेतकऱ्याला लाभ दिला नाही.
शासकीय योजनांचे खाजगीकरण होत आहे. आयुध निर्मानी संस्था, रेल्वे यांसारख्या सरकारी संस्था खाजगीकरणाच्या वाटेवर आहेत. बीएसएनएल सारखी देशव्यापी संस्था डबघाईला निघाली पण जिओ मात्र जोरात आहे. कारण हे सरकार काही शेतकऱ्यांचे नसून अदानी अंबानी यांचे सरकार असल्याचा घणाघात नाना पटोले यांनी सभेतील जनतेला संबोधीत केला आहे.
फेल झालेल्या फडणवीस सरकारची पास होण्यासाठी ‘जनादेश’ यात्रा सुरु आहे.मुख्यमंत्री यांच्या यात्रेत पैसे देऊन लोकांची गर्दी जमविण्यात आली मात्र काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेत लोक स्वयंस्फूर्तीने आले असून जनता आता सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार आहे, असे पटोले यावेळी म्हणाले.