राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समजून घेण्यासाठी भाजपला शंभर जन्म घ्यावे लागतील. त्यांचा अनुभव दांडगा आहे, अनुभवी नेते आहेत. असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.
दिल्लीमध्ये पत्रकारांनी सत्तास्थापनेबाबत विचारलं होतं. त्यावेळी पवारांनी सांगितलं होतं. सत्ता स्थापनेबाबत शिवसेना भाजपाला विचारा. यावरून राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना शरद पवार हे काहीही चुकीचं बोलले नसल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात शिवसेनेच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल आणि तेही शिवसेनेच्याच नेतृत्वात होईल, म्हणूनत पवार असं म्हणाले असल्याचं राऊत यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात शरद पवार माझे गुरू. पवारांची खरी लढाई ही भाजपाशी आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्यांवरून भाजपानं काहीतरी शिकावं असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरही भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा निश्चित नव्हता. त्यामुळे तो रद्द झाल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांचा अयोध्या दौरा रद्द झाला असं म्हणून कोणीही दिशाभूल करू नये, असंही राऊक म्हणाले. भाजपानं त्यांचा सर्वात मोठा मित्रपक्ष गमावला आहे. भाजपाच्या अंताची सुरूवात ही महाराष्ट्रातूनच होणार आहे. येत्या काळात भाजपाला याची मोठी किंमत चुकवावी लागेल. राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल आणि त्याचं नेतृत्व हे शिवसेनाच करेल. शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच स्थिर सरकार स्थापन होईल आणि यासाठी कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. आम्ही विधीमंडळात बहुमत सिद्ध करताना १७० जणांचा पाठिंबा दाखवून देऊ. राष्ट्रपती शासन हे सहा महिन्यांसाठी लागू झालं आहे. ते संपण्यापूर्वी राज्यात सरकार स्थापन होईल, असंही राऊत म्हणाले.