नागपूर : महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच धारेवर धरले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे बांधावर गेले. पण त्यावेळी तुम्ही सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत होता. सरकार पाडण्यासाठी तुम्ही देव पाण्यात घातले. पण हे सरकार सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले आहे. कितीही मुंगेरी लालची स्वप्नं पाहिली तरी ती पूर्ण होणार नाही, असाही टोला मुंडे यांनी फडणवीसांना लगावला.
विरोधी पक्षाकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा जोरदार प्रयत्न होत आहे दुसरीकडे सत्ताधारी पक्षातूनही विरोधकांना त्यांनी ५ वर्षांत काय केलं असा सवाल केला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपने दिलेला शब्द पाळला नाही म्हणूनच त्यांच्यावर विरोधात बसण्याची वेळ आली आहे, असं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं.
भाजपला लोकशाहीच कळालेली नाही. भाजपने सत्तेत येण्यासाठी ईडीचा वापर केला, आयकर विभागाच्या धाडी टाकल्या आणि केंद्र सरकारच्या इतर यंत्रणांचा वापर करुन दबाव टाकला. शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी रांगेत उभं केलं. स्वतःच्या सोयीची आकडेवारी देऊन जनतेची दिशाभूल केली. त्यामुळेच तुम्ही विरोधात बसला आहात.”
शिवेंद्रराजे आमच्यासोबत होते तेव्हा सभागृहात दुसऱ्या रांगेत बसत होते. मात्र, आता भाजपमध्ये त्यांना शेवटच्या रांगेत बसावे लागत आहे. भाजपने ज्यांना पक्षात घेतलं त्यांना सडवलं आहे हाच त्यांचा मागील 5 वर्षांचा अनुभव आहे, असाही आरोप धनंजय मुंडे यांनी केला.
धनंजय मुंडे म्हणाले, “भाजपला आज मी पुन्हा येईन असं वाटत आहे. त्यांनी उमेद ठेवावी, पण अजून 15 वर्ष तरी ते येऊ शकत नाही. तुम्ही पुन्हा सत्तेत येणार नाही हे सत्य आहे. असं असतानाही तुम्ही थाप मारत आहात. 105 आमदार असूनही त्यांना विरोधात बसावे लागले आहे. असा टोलाही धनंजय मुंडेंनी लगावला.