नागपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र आघाडी सरकारविरुध्द भाजप आमदार असा सामना चांगलाच रंगला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप आमदारांना स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं. भाजपनंही ते स्वीकारलं आहे. आज बुधवारी सायंकाळी ‘रामगिरी’वर मुख्यमंत्र्यानी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थाहून भाजप आमदारांना आमंत्रणासाठी फोन करण्यात आल्यानंतर भाजप आमदार येणार की त्यावरही बहिष्कार घालणार याविषयी चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, आता भाजप आमदार स्नेहभोजनला उपस्थित राहणार असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या सर्व दिग्गज नेत्यांसोबत विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. एकीकडे महाराष्ट्र विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असं घमासान युद्ध सुरु आहे. सावरकरांच्या आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपने सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं. यावरुन मंगळवारी सभागृहात मोठा गोंधळही पाहायला मिळाला. शिवसेना आणि भाजपच्या काही आमदारांमध्ये धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे विधानपरिषदेच्या आधी मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेमधील तणाव आणखी वाढला.
भाजप-शिवसेनेतील हाच तणाव दूर करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंकडून स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यावर आता भाजपचे नेते काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.