औरंगाबाद- पुणे जिल्ह्यातील कोरगाव भीमा ते पेरणे फाटादरम्यान आज (सोमवार) सकाळी झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे पडसाद आता औरंगाबादेतही उमटले आहेत. उस्मानपुरा भागात दुपारी दगडफेकीची घटना घडली. यात अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. सायंकाळी टीव्ही सेंटर चौकात जमाव रस्त्यावर उतरला. जमावाकडून जोरदार घोषणा देण्यात आल्या. सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला.
सूत्रांनूसार, चार-पाचशे लोक रस्त्यावर उतरले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उस्मानपुरा, क्रांती चौक परिसरात दुकाने बंद केली आहेत. कांती चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असून पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेऊन आले. मात्र, नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. अफवा पसरवल्या जात आहेत.
नामफलकावरून उद्भवला वाद…
कोरेभाव भीमा येथून जवळच असलेल्या वढू बुद्रुक येथे २९ डिसेंबरला दोन गटात नामफलकावरून वाद उद्भवला होता. यामुळे येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आहे.
परंतु, आज सकाळी अज्ञात समाज कंटकांनी गाड्यांवर दगडफेक केली. रस्त्यावर टायरही जाळण्यात आले दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोरेगाव वढू, सणसवाडी, शिक्रापूर, पेरणे ही महामार्गावरील गावे बंद ठेवण्यात आली आहेत.
भीमा कोरेगाव येथे ४० गाड्या फोडल्या..
यात ४० हून अधिक कार, गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचे समोर येत आहे. सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे तासभर तणावपूर्ण स्थिती होती. मात्र, तेथे सीआरएफच्या तुकड्या पाठवल्या आहेत. सध्या स्थितीवर पूर्ण नियंत्रणात आहे.
दरम्यान, कोरेगांव भीमा येथे आज विजय दिन साजरा करण्यात येत आहे. या वर्षी या विजयी दिनाला २०० वर्ष पूर्ण झाले आहे. यापार्श्वभूमीवर व्दिशदाब्दी महोत्सवाच आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाला लाखोंच्या संख्येने जनसमुदाय कोरेगाव भीमा येथे पोहोचला आहे.
दरम्यान, १ जानेवारी १८१८ रोजी पेशवाविरुद्धच्या युद्धात हुतात्म्य झालेल्या ५०० शौर्यशाली महार बटालियनच्या सैनिकाना अभिवादन करण्यासाठी हा विजय दिन साजरा करण्यात येतो.
याच दिवशी पेशवा आणि ब्रिटिश यांच्यात कोरेगांव भीमा येथे घमासान युद्ध झाले होते. या युद्धात ब्रिटिशांकडून लढणाऱ्या ५०० महार बटालियनच्या बलाढ्य सैनिकांनी पेशव्यांचा दारूण पराभव केला होता. तेव्हापासून कोरेगांव भीमा येथे शौर्यशाली महार सैनिकाना अभिवादन करण्या करीता १ जानेवारीला विजय दिन साजरा करण्यात येतो.
अफवांवर विश्वास ठेऊ नका..
कोरेभाव भीमासह परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून, पोलिस आणि राज्य राखीव दलाने स्थिती नियंत्रणात आणल्याचे सांगितले आहे. कोणत्याही आफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.