मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्यावतीने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची आज गुरुवारी शपथ घेत आहेत. सत्तासंघर्षात निकाल लागल्यापासून आतापर्यंत भाजपावर सडकून टीका करणारे शिवसेना खासदार संजय राऊत दररोज पत्रकार परिषदा व टि्वटमुळे चर्चेत आहेत. राऊत यांनी आज “How is Josh? जय महाराष्ट्र..” असे ट्विट केलं.
राऊत यांनी या ट्विटद्वारे प्रश्न विचारला व जय महाराष्ट्र केला? याचीच चर्चा सध्या सुरु आहे. यामुळे राऊत पुन्हा चर्चेत आले आहेत.
How is Josh?
जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2019
आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक…
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. “महाराष्ट्र हा नेहमीच देशाला दिशा दाखवत आला आहे. नवं सरकार हे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं.
राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनू नये यासाठी सर्व पर्याय वापरले गेले. परंतु आता हे सरकार स्थापन होणार आहे. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. आमच्यावर कोणत्याही सरकारी एजन्सीचा वापर केला तरी काहीही फरक पडणार नाही, असं राऊत यावेळी म्हणाले. काल बुधवारी उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संभाषण झालं. त्यावेळी त्यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या. तसंच महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे,” असं त्यांनी सांगितलं.