मुंबई – शिवसैनिकांच्या हत्येच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेले भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कर्डिले यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी देखील कदम यांनी केली आहे.
अहमदनगरच्या घटनेचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चालल्याचा आरोप कदम यांनी या बैठकीत केला. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी शिवसेनेचे विधिमंडळ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिवसैनिकांच्या हत्येचा तपास योग्य पद्धतीने करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी अहमदनगरची निवडणूक शिवसेनेच्या विरोधात लढवली. एकीकडे युतीचा हात पुढे करण्याचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे अशाप्रकारे सेनेला संपवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. निवडणुकीत शिवसेनेची मते घ्यायचे आणि दुसरीकडे सेनेचे खच्चीकरण करायचे,अशी भूमिका भाजपाने घेतल्याचे सांगत तीव्र शब्दात कदम यांनी भाजपवर टीका केली. पोलीस अधीक्षकांचे कार्यालय फोडल्याप्रकारानी आत्तापर्यंत फक्त २० लोकांना अटक झाली आहे. मात्र प्रत्यक्षात या प्रकरणात ५०० पेक्षा जास्त जणांचा सहभाग असल्याचे सांगत पोलीस या लोकांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही कदमांनी केला आहे. अहमदनगर हत्येप्रकरणाच्या निषेधार्थ ज्या शिवसैनिकांनी रास्ता रोको केला, त्याच शिवसैनिकांवर पोलीस कार्यालय फोडल्याचे गुन्हे दाखल केले गेले असल्याचेही कदम म्हणाले.