नागपूर : मुख्यमंत्री,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातील ‘कुख्यात गुन्हेगारांसोबत आठ पोलिसांचे लागेबांधे असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यामुळे आरोपी सेल मध्ये कार्यरत असलेल्या ८ पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले. पोलिसांच्या लागेबांधेमुळे गृहखात्यावर पुन्हा एकदा टिकेची झोड उठली आहे.
कोर्टातील तारीख, पेशी तसेच विविध कारणांमुळे गुन्हेगारांना कारागृहातून बाहेर काढणे, त्यांना विशिष्ट कालावधीतनंतर कारागृहात पोहचवणे यासाठी पोलीस दलात आरोपी सेल असतो. त्याला एस्कॉर्ट सेल देखील म्हणतात. सहायक पोलीस उपनिरीक्षक दशरथ चिंधूजी धुर्वे (बक्कल नंबर ५७९९), नायक शिपायी अजय कृष्णाजी नेवारे (बक्कल ११४८), सुरेश कवडूजी बेले (१५६४), मुनिंद्र काशिनाथ भांगे (१९०१), हर्षद भास्करराव पोवळे (१४९०), पोलीस शिपायी जयंत कृष्णाजी झाडे (६९७१), हवालदार मनोज नामदेवराव कोडापे (४८२२) आणि सहायक उपनिरीक्षक संजय विक्रमसिंग ठाकूर (१९८) हे सर्व आरोपी एस्कॉर्ट सेलमध्ये कार्यरत होते. ठाकूर हे शहर पोलीस दलाच्या मोटर परिवहन विभागात तर, अन्य सर्व पोलीस मुख्यालयात संलग्न होते.
कुख्यात गुन्हेगारांना कारागृहातून विविध कारणामुळे बाहेर काढल्यानंतर त्यांना त्यांच्या आवडीचे जेवण, विविध प्रकारचे ‘पेय’ तसेच तंबाखू, गुटखा, खर्यापासून तो अंमली पदार्थांपर्यंतची सुविधा पुरविली जाते. त्या बदल्यात संबंधित पोलीस कर्मचाºयांना चार दोन तासातच हजारो रुपये मिळतात. ही बाब केवळ तो गुन्हेगार, त्याचे निवडक विश्वासू साथीदार आणि आरोपी सेल मधील संबंधित पोलीस यांनाच माहित असते. त्याची कुठेही वाच्यता होत नसल्याने आरोपी सेलमध्ये ड्युटी लावून घेण्यास संबंधित पोलीस कर्मचारी ड्युटी मेजरलाही मोठी रक्कम देतात. उपरोक्त पोलीस अशाच प्रकारचे गैरकृत्य करीत होते. अनेक वर्षांपासून त्यांची पोलीस खात्यासोबतची बेईमानी सुरू होती. त्याची कुणकुण लागल्यामुळे पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील यांच्याकडे त्याची चौकशी सोपविली होती. चौकशीत उपरोक्त पोलिसांचे गुन्हेगारांसोबतचे स्रेहसंबंध उघड झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. शुक्रवारी सकाळी निलंबनाच्या आदेशाची वार्ता पोलीस दलात वायुवेगाने पसरली अन् सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली.
अट्टल गुन्हेगारांशी संपर्क…
उपरोक्त पोलीस अनेक महिन्यांपासून वारंवार आपली ड्युटी आरोपी सेलमध्ये लावून घेत होते. त्या माध्यमातून ते अट्टल गुन्हेगारांची सेवा करून मेवा मिळवायचे. एवढेच नव्हे तर त्या गुन्हेगारांसाठी ते खबरे म्हणूनही काम करायचे, असा संशय आहे. त्यांचे हे गैरकृत्य शहर पोलीस दलाची मान लज्जेने खाली घालणारे ठरल्याने गुरुवारी रात्री त्यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले. शुक्रवारी सकाळी पोलीस आयुक्तालय सुरू होताच आठ पोलीस निलंबित करण्यात आल्याचे वृत्त सर्वत्र पसरले अन् पोलीस पुन्हा बदनाम झाले. यामुळे विरोधकांना गृहखात्यावरुन मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यासाठी आयत कोलीत मिळाल आहे.