महत्वाचे…
१.नवी मुंबई आणि ठाण्याच्या परिसरात बेसुमार तिवरांच्या झाडांची कत्तल २. दुबई आणि अन्य आखाती देशांत लोकं वाळवंटात उद्यान बनवतायत, आपण मात्र त्याच्याउलट जातोय ३. निसर्गासमोर एकदिवस सर्व मातीमोल होईल अशीही भिती
मुंबई : तिवरांची कत्तल थांबवा अन्यथा मुंबई आणि आसपासच्या महानगरांचं वाळवंट होईल अशी भीती आज मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे. नवी मुंबई आणि ठाण्याच्या परिसरात बेसुमार तिवरांच्या झाडांची कत्तल झाली. याविरोधात उच्च न्यायालयात विविध याचिका प्रलंबित आहे.
विजय शिंदे नामक याचिकाकर्त्यांनी याच संदर्भात ठाणे मनपा आयुक्तांविरोधात एक जनहित याचिका दाखल केली. उच्चन्यायालय प्रशासनाला यासंदर्भात गांभीर्यानं विचार करण्याची सूचना देत सुनावणी तहकूब केली. यावेळी कोर्टाने याच गतीनं जर तिवरांची कत्तल होत राहिली तर या महानगरांत लोकवस्तीच उरणार नाही, मग आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देणार? असा सवाल केला. दुबई आणि अन्य आखाती देशांत लोकं वाळवंटात उद्यान बनवतायत, आपण मात्र त्याच्याउलट जातोय. आज मुंबईत आणि आसपासच्या परिसरात उच्चभ्रू लोकांची वस्ती वाढतेय, लोकं जीम, स्विमिंग पूल अश्या अद्ययावत सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या आलिशान टॉवरमध्ये राहायला जातायत. पण पर्यावरणाचा समतोल साधला नाही तर निसर्गासमोर एकदिवस सर्व मातीमोल होईल अशीही भितीही मुख्य न्यायमूर्तींनी बोलून दाखवली.