मुंबई: पंकजा मुंडे यांनी आपल्या राजकीय खेळीने राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. कारण विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झालेले रमेश कराड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या राजकीय नाट्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस तोंडावर पडल्याचे चित्र आहे.
रमेश कराड राष्ट्रवादीत गेल्यावर तो पंकजा मुंडे यांच्यासाठी एक धक्का मानला गेला होता. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना धक्का दिल्याची चर्चा रंगली होती. मात्र ही खेळी यशस्वी होऊ न देता परतवून लावण्यात पंकजा मुंडे यशस्वी झाल्या आहेत. आता राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी द्यायला उमेदवारच राहिलेला नाही. लातूर विधानपरिषदेसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसपुढे मोठा पेच उभा राहिला आहे.
रमेश कराड यांचे मन वळवून त्यांना भाजपातून राष्ट्रवादीतून घेण्यात आले. त्यानंतर पंकजा मुंडे सुरेश धस यांना भाजपाने उमेदवारी दिली. पंकजा मुंडे यांची ही खेळी यशस्वी ठरल्याचे चित्र दिसते आहे. राष्ट्रवादीकडून आता रमेश कराड यांच्याऐवजी आता अशोक जगदाळे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. दरम्यान रमेश कराड यांनी काही अपरिहार्य कारणांमुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असे कारण विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिले आहे.काही अपरिहार्य कारणामुळे रमेश कराड यांनी आपला अर्ज मागे घेला आहे. ती अपरिहार्यता काय आहे हे आत्ताच स्पष्ट करता येणार नाही कारण आपले त्यांच्याशी बोलणे झालेले नाही असे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.
रमेश कराड हे गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. लातूर जिल्हा बँकेची निवडणूक ते नाणेफेकीत हरले. रमेश कराड हे पंकजा मुंडे यांच्याशिवाय भाजपातील इतर कोणालाही जवळचे नव्हते. पंकजा मुंडे यांनी रमेश कराड यांना भाऊ मानले होते. मात्र विधान परिषद निवडणुकीसाठी कराड यांना उमेदवारी देण्यात त्या उत्सुक नव्हत्या. अखेर भाजपाला जय श्रीराम करत रमेश कराड यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. राष्ट्रवादीमध्ये दाखल होताच त्यांना पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी दिली. मात्र आज अर्ज मागे घेऊन त्यांनी अचानक आपल्याच पक्षाला धक्का दिला आहे. धनंजय मुंडे यांनी जरी आपली बाजू मांडली असली तरीही धनंजय मुंडे यांची खेळी त्यांच्यावरच उलटवण्यात पंकजा मुंडे यशस्वी झाल्या आहेत अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.