मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून भारतीय जनता पार्टीने ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाजपकडून किसन कथोरे यांनी तर काँग्रेसकडून नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज सकाळी ११ वाजता या पदासाठी निवडणूक होणार होती. परंतु, भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्याने नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड होणार आहे. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
विधानसभा अध्यक्ष हा बिनविरोध व्हावा ही महाराष्ट्राची परंपरा आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड यंदाही बिनविरोध व्हावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आग्रह धरला होता. त्यामुळे मी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर व सविस्तर चर्चा केली. त्यानंतर भाजपने या निवडणुकीतून माघार घेण्यासंबंधीचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.