मुंबई: भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रासह प्रामुख्याने मुंबई आणि उपनगरांत उमटले. महाराष्ट्रात बंद पुकारणाऱ्या आंदोलकांनी मुंबई शहराचीही नाकाबंदी केली. मुंबई शहराचे प्रवेशद्वार असलेला पनवेल-सायन महामार्ग आणि वांद्रे कलानगर येथील रस्ता आंदोलकांनी रोखला.
भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्रात बंद पाळण्याचे आवाहन केले. त्यानुसार ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी बंद पाळला. या बंदचा अधिक परिणाम मुख्यतः मुंबईत जाणवला. पक्षाच्या आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतूक रोखून धरली. पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्गावर रास्ता रोको केला. दहिसर, घाटकोपरमधील रमाबाई नगर येथे आंदोलक रस्त्यावर उतरले. मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरही आंदोलन केले. एकंदरीतच मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनांही खबरदारीच्या सूचना मुंबई पोलिसांकडून देण्यात येत आहेत.