मुंबई: जगभरात आर्थिक मंदी येणार असल्याचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. भारताची अर्थव्यवस्थाही गंभीर आहे. गेल्या आर्थिक वर्षात एक कोटी 10 लाख लोकांचा रोजगार गेला,अशी आकडेवारी आहे.
देशातल्या तरुणांना बेरोजगारीची चिंताही भेडसावते आहे. देशभरात 7 कोटी 80 लाख व्यक्ती बेरोजगार आहेत. या सगळ्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असून भारताची अर्थव्यवस्था ढासळून गेली आहे. दुचाकी वाहनांची विक्री १७ टक्क्याने तर चारचाकी वाहनांची विक्री २३ टक्याने घटली आहे. बांधकाम क्षेत्रातही मंदी आहे. ३० मोठ्या शहरांत सुमारे साडेचार लाख घरं पडून आहेत. अतिश्रीमंताच्या उत्पन्नावरचा प्राप्तिकर अधिभार वाढवल्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनीही शेअर बाजारातून गुंतवणूक काढली आहे.
बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकले
सरकारी नोकऱ्यांमध्येही चिंताजनक परिस्थिती आहे. बीएसएनएलकडे १लाख ५४ हजार कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी पैसे नाहीत. १८ सरकारी बँकांचं थकीत कर्जही १० लाख कोटींपेक्षा जास्त झालं आहे.अर्थव्यवस्थेच्या या मंदीबद्दल तज्ज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे. वित्तीय कंपन्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना करणं आणि खासगी क्षेत्रातल्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे, असं रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ.रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.