मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आज गुरुवारी पहिली अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेने पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवा आणि राकेश वाधवा यांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे एचडीआयएल कंपनीचे संचालक आहेत.
पीएमसी बँकेचं कर्ज घेऊन बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल आणि वाधवा यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. संबंधित 10 खात्यांपैकी एक खाते सारंग वाधवा यांचे तर दुसरे राकेश वाधवा यांचे खासगी खाते आहे. पोलिसांनी आज दोघांनाही चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, तपासात सहकार्य करत नसल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची जवळपास 3 हजार 500 कोटी रुपयांच्या संपत्तीवरही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
मेसेजेसनंतर पीएमसी बँकेबाहेर उडाला होता गोंधळ
रिझर्व्ह बँकेने मुंबईतील पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर 6 महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. बँकेने तसे एसएमएस ग्राहकांना पाठवले आहेत. या मेसेजेसनंतर पीएमसी बँकेबाहेर ग्राहकांच्या पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या होत्या.
सुरुवातीला आरबीआयने ग्राहकांना महिन्यातून केवळ 1 हजार रुपये काढण्याचे निर्बंध लादले होते. मात्र, ग्राहकांचा असंतोष पाहता ही मर्यादा वाढवून 6 महिन्यात 10 हजारांवर नेली. मात्र, तरिही दैनंदिन खर्च, आजार, शिक्षण आणि इतर गोष्टींवरील खर्चासाठी ही रक्कम तोकडी असल्याची ग्राहकांची तक्रार आहे.
खातेदारांवर हे आहेत निर्बंध
- एका खातेधारकाला एका खात्यातून 6 महिन्यात केवळ 10 हजार रुपयेच काढता येतील.
- तुमच्या खात्यात कितीही रक्कम असली तरी 6 महिन्यात केवळ 10 हजार रुपयेच काढता येतील.
- जर तुम्ही पीएमसी बँकेचं कर्ज घेतलं असेल, तर तुमच्या हप्त्याची रक्कम खात्यात वळती होईल.
- कर्ज फेडण्यासाठी कर्जदार त्यांच्या ठेवींचा वापर करू शकतात.