मुंबई : सत्तावाटपाच्या गोंधळात शिवसेनेला भाजपनं अखेर निर्वाणीचा इशारा दिला. येत्या ७ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असा इशारा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेनेला दिला आहे.
शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीसाठी आक्रमक आहे. तर, भाजपनं मुख्यमंत्रीच काय, महत्त्वाची खातीही देण्यास नकार दिल्यानं गाडं अडलं आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये केवळ कलगीतुरा रंगला आहे. भाजप वर्चस्ववादाचं राजकारण करत असल्यानं शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. कोणीही मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही, असं वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानं हा पेच अधिकच वाढला आहे.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्राच्या वाटाघाटीतून अंग काढून घेतलं असून राज्यातील नेत्यांनाच पेच सोडवण्याचा आदेश दिला आहे. मात्र, शिवसेना ऐकत नसल्यानं भाजपनं राष्ट्रपती राजवटीचं अखेरचं अस्त्र बाहेर काढलं आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, असं म्हटलं आहे. यामुळे आणखीनच पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.