मुंबई : शहरात महिन्याला 25 ते 30 हजार मोठे गुन्हे घडतात. त्यात बहुतेक गुन्ह्यांत आरोपी अनोळखी व्यक्ती असते. मात्र गेल्या दोन तीन वर्षांपासून महिला पर्यटकांवरील हल्ले आणि विशेषत: आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांत प्रचंड मोठी वाढ होत असल्याचे मुंबई शहराचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी आज सांगितले. महिला अत्याचाराचे गुन्हे रोखणे हे मुंबई पोलीस दलासमोर एक आव्हान असल्याचेही ते म्हणाले. अत्याधुनिक शोध प्रणालीचा वापर करणारे मुबंई हे पहिले पोलीस दल आहे. त्यामुळे सर्व बाबींनी मुंबई सुरक्षित असल्याचा विश्वासही त्यांनी मुंबईकरांना दिला.
मुंबई मराठी पत्रकार संघाने शनिवारी आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी विश्वस्त अजय वैद्य आणि उपाध्यक्ष सुधाकर काश्यप देखील मंचावर उपस्थित होते.समाजात सर्वच बुद्धीमान नसतात. श्रेय, प्रिय आणि अप्रिय यातील फरक समजून घेतला की माणसांकडून चुका होत नाहीत. बदलत्या जगातील आभासी कल्पना वास्तवात आणू पाहता त्यातच त्याची चूक होऊन अपराध घडतो. समाजात तणाव खूप आहे. त्यातून मार्ग काढायचा असेल तर स्वत:चे समुपदेशन स्वत: करावे लागेल. लोकशाही पद्धतीत मागणी करणे आवश्यक असतेच, मात्र प्रत्येक मागणीची पूर्तता होईल याची खात्री देता येत नाही. नकाशावरून ओढलेल्या रेषा या दोन देशांचा सीमा कधीच होऊ शकत नाहीत. सोशल मीडिया ही वस्तूस्थिती आहे. ती चूक, बरोबर, वाईट, चांगली असे म्हणणे योग्य नाही.
पोलिसांना सायबर गुन्हे रोखण्यात यश मिळत आहे. भविष्यात जरी असे गुन्हे वाढले तरी त्याच्या मुळापर्यंत जाण्याची व्यवस्था आहे. मात्र, सायबर गुन्ह्यांना देशाची सीमा नाही. त्यामुळे तपास कार्यात अनेकदा उशीर होतो. नव्या यूपीआय कायद्याचा फायदा पोलिसांना होईल. दहशतवाद मोडून काढण्यासाठी तो महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास देखील पोलीस आयुक्त श्री. संजय बर्वे यांनी व्यक्त केला.