महत्वाचे….
१. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल पाठवून केला आरोप
२. महाराष्ट्रात माहिती अधिकार आयुक्तांच्या पदांवर नियुक्ती नाही
३. राज्यात मुख्य माहिती आयुक्त तसंच तीन आयुक्तांच्या जागा रिकाम्या
मुंबई : महाराष्ट्र राज्यात माहिती अधिकाराचा गळा घोटला जात असल्याचा आरोप देशाचे माजी माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल पाठवून हा आरोप केलाय. महाराष्ट्रात माहिती अधिकार आयुक्तांच्या पदांवर नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे माहिती अधिकाराखालील प्रलंबित प्रकरणांचा डोंगर साचू लागला आहे.
शैलैश गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील माहिती अधिकार क्षेत्रातील परिस्थितीची जाणीव करुन दिली आहे. सध्या राज्यात मुख्य माहिती आयुक्त तसंच तीन आयुक्तांच्या जागा रिकाम्या आहेत. या जागा भरण्यासाठी वारंवार स्मरण देऊनही त्या भरल्या जात नाहीत. त्याची गांधी यांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीत माहिती दिली होती. गेल्यावर्षी जुलै महिन्यात आणि त्यानंतर पुन्हा ऑक्टोबरमध्ये ही माहिती दिल्याचे गांधी यांनी नमूद केले आहे. परंतु त्यानंतरही रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही झालेली नाही. माहिती आयुक्तांची पदे भरली जात नसल्याने राज्यभरात माहिती अधिकाराखालील प्रकरणांचा डोंगर साचत चालला आहे.
विभागवार प्रलंबित प्रकरणे पुढील प्रमाणे…
१ नाशिक ९९३१
२. पुणे ८६४७
३. अमरावती ८०२६
४. मुंबई (मुख्यालय) ४८७०
शैलेश गांधी यांनी आपल्या इमेलमध्ये ही आकडेवारीही मांडली आहे. माहिती अधिकार आयुक्तांच्या नेमणुका होत नसल्याने माहिती अधिकाराचा गळा घोटल्यासारखंच होत असल्याचे ते म्हणालेत. तसेच निवृत्तीनंतर सरकारी नोकरशहांची सोय लावण्यासाठी या पदांचा वापर होऊ नये असेही त्यांनी बजावले आहे.