मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री भाजपचे खासदार रावसाहेब दानवे राज्यातील सगळ्यात धोकादायक नेते आहेत. रावसाहेब दानवे यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे, त्यांना पराभूत केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असा इशारा अब्दुल सत्तार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला.
सत्तेसाठी भाजपसोबत गेलेले अनेक आमदार आणि नेते महासेनाआघाडीसोबत येणार आहेत. आठ दिवसात सत्तास्थापनेची तयारी पूर्ण होईल, असा विश्वास यावेळी अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. शरद पवार हे चतूर नेते आहेत, ते लवकर सरकार स्थापन करतील, असंही अब्दुल सत्तार म्हणाले.
नांदेड इथे झालेल्या पत्रकार परिषदेत रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द भाजपाच्या कोणत्याही नेत्याने दिला नव्हता. अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री असा शब्दप्रयोग कोणीही केला नाही, असा दावा दानवे करत आहेत. दानवेंच्या या दाव्यानंतर अब्दुल सत्तारांनी त्यांना उत्तर दिलं होतं. रावसाहेब दानवे यांना सेनेवर टीका करण्याचा अधिकार नाही. करार झाला तेव्हा ते दाराबाहेर बसले होते. त्यांना या ठरावाची काहीच माहिती नाही. येणाऱ्या लोकसभेत रावसाहेब दानवे हे घरी बसतील, असा सज्जड इशाराही अब्दुल सत्तार यांनी दिला होता. आज पुन्हा एकदा अब्दुल सत्तारांनी रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला.