मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे काँग्रेसला नववर्षात नवा अध्यक्ष मिळणार आहे. प्रदेशाध्यक्षपदाची धूरा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता आहे. याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी लवकरच घेणार असल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरु आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता पक्षाला बळकटीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे पक्षात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. काँग्रेसला ४४ जागांवर विजय मिळाला होता.
निकालानंतर भाजपा-शिवसेनेतील वाद विकोपाला गेला. त्यात शिवसेनेने सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेससमोर हात पुढे केला होता. यात बाळासाहेब थोरात यांची महत्त्वाची भूमिका होती. सरकार स्थापन झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची धूरा आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे. चव्हाण यांच्या पाठीशी केंद्रातील अनुभव असून, राज्याचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्याची दाट शक्यता आहे. मात्र, प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
पृथ्वीराज चव्हाणांचे दिल्लीदरबारी वजन…
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे दिल्लीदरबारी चांगले वजन असून अनुभवी नेते आहेत. चव्हाण हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे अत्यंत विश्र्वासू नेते आहेत. त्यामुळे चव्हाणांकडे महाराष्ट्राची धूरा येण्याची दाट शक्यता आहे.