मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदाचा वाद सुरू आहे. 9 तारखेला 13 व्या विधीमंडळाची मुदत संपणार आहे. भाजपने अद्याप सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. त्यामुळे शिवसेना-भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने स्वत: पुढाकार घेऊन राज्यात सरकार स्थापन करावं, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आंबेडकर यांनी ही मागणी केली आहे. काँग्रेसने पुढाकार घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करावा. बहुमताचा प्रश्न आता महत्त्वाचा नाही. सभागृह चालवण्याची जबाबदारी सरकारची असते. तसं झालं नाही तर सरकार कोसळेल. त्यामुळे नव्या सरकारसोबत जायचं की नव्याने निवडणुका घ्यायच्या हे सदस्यांनाच ठरवायचं आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आंबेडकर यांनी राज्यपालांना काही पर्यायही सूचवले आहेत. ज्या दिवशी शपथविधी होतो तो दिवस विधिमंडळाचा पहिला दिवस मानला जातो. त्यामुळे आम्ही राज्यपालांशी चर्चा केली. मागीलवेळी 8 नोव्हेंबरला शपथविधी झाला होता. तो कार्यकाळ उद्या संपत आहे. त्यामुळे आज रात्री किमान सरकार स्थापन झालं पाहिजे. अन्यथा निवडून आलेल्या 4 ते 5 विधिमंडळ सदस्यांचा शपथविधी तरी घ्यावा लागेल. त्यानंतरच सभागृह गठित झालं असं म्हणता येईन. या दोन्ही गोष्टी होणार नसतील, तर 356 कलमानुसार राष्ट्रपती शासन लागू करावे लागेल. त्याला पर्याय राहणार नाही, असं आंबेडकरांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.