मुंबई : कांद्याने सर्वसामान्यांच्या रडवल्यानंतर आता बटाट्याचे दरही वाढत चालले आहेत. घाऊक बाजारात बटाट्याचा भाव 28 ते 29 रुपये प्रतिकिलो झाला आहे, तर किरकोळ दर हा 35 ते 40 रुपयांवर गेला आहे. त्यामुळे कांद्यापाठोपाठ बटाटाही ताटातून गायब होण्याची भीती वर्तवली जात आहे. मात्र, बटाट्यानेही भाव खाल्ले एवढे मात्र नक्की.
अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पालेभाजांची आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे दरांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. त्यामुळे पालेभांज्याचे दरही वाढत चालले आहेत. भाज्या संपल्यावर अडीअडचणीला धावून येतो तो बटाटा. काही जणांना प्रत्येक भाजीत बटाटे घालण्याची आवड असते. तर वडापावपासून बटाटा भजी आणि दाबेलीपासून सँडविचपर्यंत अनेक फास्टफूडच्या पदार्थांतही बटाटा असतो. मात्र बटाट्यालाही महागाईचा फटका बसलेला दिसत आहे.
आता बटाट्याचे दरही वाढले आहे. गेल्या आठवड्यात ठोक बाजारात बटाटे 10 ते 12 रुपये प्रतिकिलो होते, तर किरकोळ बाजारात बटाटे 18 रुपये किलो दराने विकले जात होते. मात्र आता घाऊक बाजारात बटाटा 28 ते 29 रुपयांवर गेला असून किरकोळ बाजारात तो 35 ते 40 रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. मागणीच्या तुलनेत बटाटा कमी येत असल्याने ही दरवाढ झाली आहे.