मुंबई : पुण्याच्या कोथरूड मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेळी खेळली. कोल्हापूर जिल्हा सोडून कोथरूडमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना उमेदवारी देऊन. भाजपात दोनगट पडले आहे. स्थानिकांनी पाटलांना विरोध केल्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पक्षाचे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते चंद्रकांत पाटलांना कोल्हापूर जिल्ह्यात उमेदवारी न देता थेट पुण्यातील कोथरूडसारख्या सुरक्षित मतदारसंघात उतरवून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. थेट शरद पवार यांनाही हे आव्हान देण्यात आले आहे.
पाटील हे विधान परिषदेच्या पुणे पदवीधर संघाचे प्रातिनिधित्व करीत आहेत. गेल्या काही काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटील यांनी जनतेतून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान वारंवार दिले होते. त्या पार्श्वभूमीवर पाटील यांना थेट पवार यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातूनच विधानसभेत पाठविण्याची खेळी भाजपने खेळली आहे. राज्यातील महत्त्वाच्या मंत्रिपदासोबतच पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदही आहे. त्यामुळे राज्यासह पुण्याच्या भाजपच्या नेतृत्वाचा केंद्रबिंदूही त्यांच्या रूपाने कोथरूडकडे सरकरण्याची शक्यता आहे. स्थानिक भाजपमधील समीकरणे त्यामुळे बदलणार आहेत. माजी पालकमंत्री आणि खासदार गिरीश बापट यांच्या शहरातील वर्चस्वाला हे आव्हान मानले जात असून, शहरात नवे नेतृत्व तयार करण्याचा पक्षाचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
पुण्याचे पालकमंत्रिपद देऊन पाटील यांना शहरात स्थिरावण्यासाठी वेळ दिल्यानंतर आता त्यांच्याकडे पुण्याचे संपूर्ण पालकत्त्व देण्यासाठीच कोथरूडसारखा मतदारसंघ देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र स्थानिक पदाधिका-यांनी पाटलांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणीत उमेदवारी अर्जदाखल करण्याआधीच अडच निर्माण झाली आहे.