महत्वाचे…
मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी नितीन गडकरींची खिल्ली उडवली
२५ पानी सविस्तर अहवाल गडकरींनी राज ठाकरेंना पाठवला
मनसेच्या उत्तराकडे सर्वांचे लक्ष
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत केलेल्या आरोपांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लेखी उत्तर पाठवलं आहे. आतापर्यंत मी ज्या–ज्या प्रकल्पांच्या घोषणा केल्या, त्याची कागदपत्र सभेच्या दुसऱ्याच दिवशी राज ठाकरेंना पाठवल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं. याबाबतचा २५ पानी सविस्तर अहवाल गडकरींनी राज ठाकरेंना पाठवला.
यामध्ये महाराष्ट्रात आतापर्यंत कुठं कुठं किती किलोमीटरचे रस्ते तयार केले, त्यासाठी किती निधी मंजूर झाला, किती दिवसात रस्ता तयार झाला, याची सगळी माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रात रस्त्याच्या कामांसाठी २ लाख ८२ हजार कोटी, बंदरविकासासाठी ७० हजार कोटी तसंच सिंचन प्रकल्पांसाठी ७५ हजार कोटी रुपये मंजूर झाल्याचं, गडकरींनी राज ठाकरेंना पाठवलेल्या अहवालात म्हटलं आहे.
मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी नितीन गडकरींची खिल्ली उडवली होती. शिवाय गडकरी फक्त घोषणा करतात, कामं करत नाही, असा आरोप केला होता. त्याला आता गडकरींनी लेखी उत्तर पाठवलं.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
नितीन गडकरी कुठेही भाषण गेले की, साबणाच्या पाण्याचे फुगे सोडल्याप्रमाणे हिशेब सांगतात. इतके कोटी खर्च केले, तितके लाख खर्च केले, असं गडकरी म्हणतात. पण पैसेच नाहीत तर खर्च कसा करता, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित करत, खिल्ली उडवली होती.
साबणाची बाटली असते आणि त्यात बुडवून फुगे सोडतात, तसं नितीन गडकरी कुठेही गेले की १ लाख कोटी, फू…..२ लाख कोटी फू.. करतात. पण पैसे आले कुठून? ते आले की तुम्ही (जनतेने) करा फू… असं राज म्हणाले होते.