मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं १० रुपयात थाळी योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यासाठी तीन महिन्यांमध्ये ६ कोटी ४८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या संदर्भातले ट्विट करुन ही माहिती दिली आहे. राज्यसरकारच्या या निर्णयानंतर भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर एक फोटो टाकून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल करत टीका केली आहे.
निलेश राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांच्यासमोर जेवण वाढलेलं दिसत आहे. तो फोटो ट्विट करून ही थाळी किती रूपयांची आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. या फोटोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे दिसत आहेत.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात १० रुपयांच्या थाळीची घोषणा केली होती. सत्तेत आल्यामुळे ती योजना राबवणार आहेत. १० रुपयांमध्ये मिळणाऱ्या थाळीत दोन पोळ्या, भाजी, वरण आणि भात यांचा समावेश असणार आहे. या थाळीला शिवभोजन असे नाव देण्यात आले आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर ५० ठिकाणी हे शिवभोजन मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात आली. काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेतही १० रूपयांमध्ये थाळी सुरू करण्यात आली होती. परंतु ती केवळ पालिका कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठीच होती. त्यानंतर ही थाळी सर्वसामान्यांना कधी मिळणार हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता शिवभोजन योजनेला म्हणजेच १० रुपयांत थाळी मिळण्याच्या योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच ही थाळी सामान्यांसाठीही उपलब्ध होणार आहे.
ही थाळी किती रुपयाची आहे??? pic.twitter.com/eFccKefIkW
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 25, 2019
निलेश राणे हे शिवसेनेवर एकामागून एक हल्ले ट्विटरच्या माध्यमातून करत आहेत. परंतु दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत फेसबुक पोस्ट टाकणा-या व्यक्तीचे शिवसैनिकांनी मुंडण करत मारहाण केली होती. भाजपने पीडित तरुणाची बाजू घेत शिवसेनेवर निशाना साधला होता. त्यानंतर युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना सबुरीचा सल्ला दिला होत. सोशल मीडियातील ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करा असेही सांगितले होते. त्यामुळे निलेश राणे यांच्या ट्विटला शिवसेना कशा प्रकारे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.