मुंबई : कोरोनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मुंबईकरांना डबे पुरविणाऱ्या डबेवाल्यांनीही शुक्रवारपासून येत्या ३१ मार्चपर्यंत डबे पुरविण्याची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १३० वर्षात प्रथमच १० दिवस सेवा बंद ठेवण्याची घटना प्रथम घडली आहे.
गेल्या १३० वर्षापासून मुंबई डबेवाल्यांची सेवा अविरतपणे सुरु आहे. दोन लाख मुंबईकरांना डबा पुरवण्याचे काम डबेवाले करत आहेत. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार २० ते ३१ मार्चपर्यंत ही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजारातील गर्दी टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्याचं आवाहन मुंबई पालिकेने केले होते. त्याला दुकानदारांनी प्रतिसाद देत काही ठिकाणी दुकाने दिवसाआड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दादर, धारावी आणि माहीममधील व्यापाऱ्यांनी ही दुकाने दिवसाआड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणीही सुरू केली होती. मात्र मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने दादर व्यापारी संघाने गुढीपाडव्यापर्यंत म्हणजे २५ मार्चपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दादर व्यापारी संघाने पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना तसे पत्र देऊन हा निर्णय जाहीर केला आहे.
मुंबई महापालिकेने केलेल्या आवाहनाला मुंबईतील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दादरमधील व्यापाऱ्यांनी गुढीपाडव्यापर्यंत ६०० दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.