मुंबई : मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज जाहीर केला. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून शरसंधान साधला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देणं हे दुर्दैवी आहे. असंही देवेंद्र फडणवीस यांनी टि्वटकरून म्हटलं आहे.
मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येते. शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच ! #SaveMetroSaveMumbai
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 29, 2019
जपानच्या जायकाने अत्यल्प व्याजदराने सुमारे १५ हजार कोटींचे कर्ज मेट्रो प्रकल्पासाठी दिलं होतं. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही हेच यातून दिसून येते असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरे कारशेडला स्थगिती दिली आहे. आरे कारशेडमध्ये झालेल्या वृक्षतोडीवरुन शिवसेनेने भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली होती. तसंच आमचं सरकार आलं तर आम्ही आरेला जंगल घोषित करणार असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी मोठा निर्णय जाहीर केला.