मुंबई: शिवसेना भाजपा युती तुटल्यामुळे भाजपने महापालिका जिंकण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. येणारा मुंबईचा महापौर हा भाजपचाच असणार, असा दावा भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे.
मुंबईचा पुढचा महापौर भाजपचा असणार, त्या दृष्टीने आमची मजबूत तयारी सुरु आहे. गेल्यावेळी आम्ही एक ते दोन जागांवर कमी पडलो होतो. पण आता मुंबईचा महापौर भाजपचा असेल, असेही आमदार राम कदम म्हणाले.
मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुंबईत मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन 11 दिवस उलटले तरीही अजून खातेवाटप झाले नाही. मंत्रिपद कुणाला द्यायचे याचा विचार हे सरकार करत आहेत. सरकारमध्ये एकजूट नसल्यामुळे त्यांना निर्णय घेता येत नाही असेही आमदार राम कदम म्हणाले.