मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. गुरुवारी 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून मद्यविक्रीची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयने दिली आहे. यामुळे तळीरामांना मोठा दिलासा मिळाला आहे.
निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होते. दारूचे वाटपही करण्यात येते. मुंबई उच्च न्यायलयाने दिलेल्या निर्णयानुसार, 24 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजल्यानंतर मद्यविक्रीची परवानगी देण्यात आली आहे. मात्र आज (20 ऑक्टोबर) आणि उद्या (21 ऑक्टोबर) या दोन्ही दिवशी दारु विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाला हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
मुंबईतील जिल्हाधिकाऱ्यांनी 4 ऑक्टोबर रोजी मतदानादिवशी मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जारी केला होता. या आदेशाला महाराष्ट्र वाईन मर्चंट्स असोसिएशनने कडाडून विरोध केला होता. तसेच याविरोधात वाईन मर्चंट असोसिएशनने न्यायालयात धाव घेतली होती.
लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 135 C अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश काढला होता. यानुसार सर्व देशी दारु, ताडी आणि अन्य मद्यविक्री दुकान मालकांनी 19 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजल्यानंतर दुकान बंद करावीत. ही सर्व दुकाने 20 ऑक्टोबर आणि 21 ऑक्टोबर रोजी संपूर्ण दिवस बंद राहतील. तसेच मतमोजणीच्या दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबर रोजीही दारु विक्रीची दुकान बंद ठेवावीत असेही या निर्णयात म्हटलं होतं.
“जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय जाहीर करताना मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळी 6 नंतर अन्य जिल्ह्यात दुकानं सुरु ठेवण्यात यावी असे नमूद केलं आहे. मात्र या मुंबईला वगळण्यात आले आहे. त्यामुळे हा संपूर्ण आदेश हा मनमानी असून यामुळे व्यवसाय करणाऱ्या अधिकाऱ्यावर गदा येऊ शकते.” असे वाईन मर्चंट असोसिएशन यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे वाईन विक्रेत्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यताही याचिका कर्त्यांनी वर्तवली आहे. त्यानंतर येत्या गुरुवारी मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर दुकान सुरु ठेवावीत असा निर्णय उच्च न्यायलयाने दिला आहे.