मुंबई: मी पुन्हा येईन या विधानावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सत्ताधा-यांनी चांगलीच खिल्ली उडवली. त्याला उत्तर देतांना फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन म्हणालो होतो. पण वेळापत्रक सांगितलं नव्हतं, त्यामुळे वाट पाहा…अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरील टीकेला आज सभागृहात उत्तर दिले.
फडणवीसांनी आज रविवारी काल सभागृहात झालेल्या प्रकारावरून पडदा टाकण्याचे काम केले. आक्रमक न होता संशयाचीच भूमिका बजावतांना ते दिसले. यावेळी फडणवीसांना मी पुन्हा येईन या वक्तव्यावरून फडणवीस म्हणाले, ‘मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट के वापस आऊंगा,’ अशा कवितेच्या ओळी देवेंद्र यांनी म्हटल्या आणि सभागृहात बाके वाजवून सर्वांनी त्यांना दाद दिली.
‘लोकशाहीत अशा अनेक गोष्टी घडत असतात. ७० टक्के मार्क मिळूनही आम्ही मेरिटमध्ये आलो नाही, ४० टक्के मिळालेले तिघे १२० टक्क्यांनी मेरिटमध्ये आले,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी नव्या सरकारच्या आघाडीची आकडेमोड केली.
आपल्यावरील अभिनंदनाच्या ठरावाला उत्तर देताना फडणवीस यांनी सभागृहात जोरदार भाषण केलं. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं.
फडणवीस उद्धव यांच्याबद्दल म्हणाले की प्रेमाचे, जिव्हाळ्याचे मैत्रीचे संबंध राजकारणापलिकडे असतात. ‘जनतेकडून त्यांच्या मनात ज्या आशा, आकांक्षा, अपेक्षा आहेत; तसेच मुख्यमंत्र्यांच्याही महाराष्ट्राच्या विकासासाठी काही योजना असतील, त्या सर्वांसाठी आम्ही त्यांना सहकार्य करू,’ असे ते म्हणाले.