मुंबई : घाटकोपर साकीनाका खैराणी रोड येथे लागलेल्या आगीत दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. याबाबत साकीनाका पोलिसांनी सुमारे २४ तासांनंतर गुन्हा नोंदवला आहे. मथुरादास भद्रा, प्रताप गौरी, उडायलाला गौरी आणि खेमसिंग राजपूत यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या तिघांना साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे.
साकीनाका खैराणी रोडवरील आशापुरा कंपाऊंडला शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला असून एकजण अद्याप बेपत्ता आहे. आरती जयस्वाल (२५) आणि पीयूष पिताडिया (४९) अशी मृतांची नावे असून या आगीमध्ये सुमारे ३५ ते ४० व्यावसायिक गाळे जळून खाक झाले. केमिकल, कापड आणि लाकूड यांसारख्या ज्वलनशील वस्तूंमुळे भडकलेल्या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा तासांनी नियंत्रण मिळवले.
साकीनाका येथील खैरानी रोडवर अनेक व्यावसायिक गाळे आणि इंडस्ट्रीज आहेत. जंगलेश्वर मंदिर जवळच्या आशापुरा कम्पाऊंडमधील तीन मजली इमारतीमधील दोन गाळ्यांना शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आग लागली. दाटीवाटीचा परिसर, केमिकल, लाकडांची गोदामे आणि त्यातच लागूनच अनेक झोपड्या असल्याने काही वेळातच आगीचा भडका उडाला. सुरुवातीला ही आग लेव्हल-३ ची असल्याचे सांगण्यात येत होते मात्र ज्वलनशील वस्तूंमुळे आगीच्या प्रचंड ज्वाळा निर्माण होत असल्याचे पाहून अग्निशमन दलाने ही आग लेव्हल-४ ची असल्याचे जाहीर केले. १६ फायर इंजिन, २ वॉटर टँकर, १० जम्बो वॉटर टँकर यांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. बीपीसीएल, एचपीसीएल, पालिका कर्मचारी व इतर यंत्रणांनाही मदतकार्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर मध्यरात्री ११.३०च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. प्रताप गौरी फरार असून अद्याप अटक करण्यात आली नाही. याबाबत साकीनाका पोलीस ठाणे अधिक तपास करत आहेत.