अर्थतज्ञ परकला प्रभाकर यांनी आपल्या वृत्तपत्रातील लेखामध्ये याचा प्रकर्षाने उल्लेख केलेला आहे. निर्मला सीतारामन यांच्या घरातूनच भाजप सरकारला खरा आरसा दाखवलेला आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावर काहीच बोलत नाहीत. उलट ते जनतेचे लक्ष ३७० कलमावरच केंद्रित करून मुख्य मुद्द्यांना बगल देत आहेत, भारताची अर्थव्यवस्था भविष्यात सुधारण्यासाठी भाजप सरकारकडे कोणताच रोड मॅप नाही, अशा कडक शब्दांत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते आर. पी. एन. सिंग यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.
मुंबईमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत सिंग बोलत होते. यावेळी पत्रकार परिषदेत AICC प्रवक्ते आर पी एन सिंग, श्री जयवीर शेरगील, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी आमदार चरणसिंग सप्रा, AICC प्रवक्ते राजीव त्यागी, मुंबई महाराष्ट्र प्रदेश समितीचे (MPCC) प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.
आर पी एन सिंग पुढे म्हणाले की, भाजप सरकारच्या मागील ५ वर्षाच्या काळात महाराष्ट्रातील २२ हजार कंपन्या आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत. पुण्यातील ऑटो इंडस्ट्री सुद्धा धोक्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील उद्योग धंदे महाराष्ट्राच्या बाहेर चालले आहेत. ४० वर्षात जेवढी बेरोजगारी नव्हती तेवढी बेरोजगारी आता निर्माण झालेली आहे. नवीन गुंतवणूक झालेली नाही. लघू व मध्यम व्यवसाय देशोधडीला लागलेले आहेत. जीडीपी घसरलेला आहे. महाराष्ट्र राज्यात ज्यावेळेस काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळेस महाराष्ट्रात सर्वात जास्त गुंतवणूक झाली होती. पण आज महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीचा दर खालावला आहे. पण यावर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच भाष्य करत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा राज्याच्या खालावत चाललेल्या आर्थिक स्थितीबद्दल काहीच भाष्य करत नाहीत. पीएमसी बँकेसारखी बँक आज बंद पडली आहे. १६ लाख खातेदार आज त्यांच्याच गुंतवलेल्या पैशांसाठी बँकेचे उंबरे झिजवत आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर काहीच बोलत नाहीत. बहुमताच्या जोरावर भाजप सरकारने आरबीआय कडून १.७६ लाख करोड रुपये काढले. पण पीएमसी बँकेला बुडण्यापासून वाचवण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. महाराष्ट्रातील ५० हजार शेतकरी कर्जमाफीसाठी मुंबईत मोर्चा काढत पायी चालत आले. पण त्यांची कर्जमाफी अजून त्यांना पूर्णपणे मिळालेली नाही. यावर सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीच बोलत नाहीत. तेच काय, पण भाजपचा कुठलाच नेता विकासाबद्दल काहीच बोलताना दिसत नाही आहे. त्यांच्याकडे विकासाची कोणतीही योजना नाही. ते फक्त काँग्रेस पक्षाबद्दल बोलत असतात व त्यावर राजकारण करू पाहतात, हीच खरी शोकांतिका आहे, या पत्रकार परिषदेमध्ये आर पी एन सिंग यांच्यासोबत ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (AICC) चे प्रवक्ते जयवीर शेरगील सुद्धा उपस्थित होते.