मुंबई: शिवसेनेने आधी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतून बाहेर पडावं. त्यानंतर सरकार स्थापन्यासाठीचा आम्हाला प्रस्ताव द्यावा, त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते मुंबईच राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी सांगितलं.
राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहोत. ते काय निर्णय घेतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, असंही नवाब मलिक म्हणाले. शिवसेनेने आधी भाजपसोबतचं नातं तोडलं पाहिजे. त्यांनी केंद्रसरकारमधून बाहेर पडतानाच एनडीएमधूनही बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं पाहिजे. असंही नवाब मलिक यांनी सांगितले.
केंद्रात सत्तेत आणि राज्यात वेगळ्या आघाडीत असं चित्रं निर्माण होईल. त्यामुळे शिवसेनेने एनडीएतूनबाहेर पडून सत्ता स्थापनेबाबतचा रितसर प्रस्ताव द्यावा. त्यांच्या अटी-शर्तीही सांगाव्यात. त्यानंतर आम्हाला काँग्रेसशी चर्चा करून निर्णय घेता येईल. शिवसेनेचा रितसर प्रस्ताव आल्यावरच चर्चा पुढे जाईल, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.
राज्यात कोणतेही दोन पक्ष सत्ता स्थापन करू शकत नाहीत. त्यासाठी तीन पक्ष एकत्र यायला हवेत. तीन पक्ष एकत्र आले तरच सत्ता स्थापन होऊ शकते. अन्यथा वेळकाढूपणा होईल. त्यामुळे काँग्रेस आघाडी सरकार स्थापनेसाठी दावा करणार नाही. आमच्याकडे बहुमत नाही. आकडा नाही. त्यामुळे आम्ही सत्तेचा दावा करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, राष्ट्रवादीची मंगळवारी बैठक होणार आहे असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.