महत्वाचे…
१. दोन वर्षांपूर्वीच मलिकाने भाजपा पक्षात प्रवेश केला होता
२. उन्नाव आणि कठुआ बलात्काराच्या घटनेमुळे आपण प्रचंड दुखी
३. राजकीय पोळी भाजण्यासाठी हिंदू-मुस्लिम दंगल घडवू शकतो
मुंबई: दोन वर्षांपूर्वी पक्षात प्रवेश करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री मलिका राजपूतने भाजपाला रामराम ठोकला आहे. पक्ष सोडताना त्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. ‘रिव्हॉल्वर राणी’ चित्रपटात कंगना रणौतसोबत काम केलेल्या मलिकाने आपल्या अब्रूला धोका होता त्यामुळेच आपण भाजपा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. उन्नाव आणि कठुआ बलात्काराच्या घटनेमुळे आपण प्रचंड दुखी होतो असं तिचं म्हणणं आहे. भाजपामधून बाहेर पडलेल्या मलिकाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
‘उन्नाव आणि कठुआ बलात्काराच्या घटनेनंतर तुम्हाला वाटतं का एक महिला असल्याच्या नात्याने मला भाजपात सुरक्षित वाटलं असतं? जो पक्ष आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हिंदू-मुस्लिम दंगल घडवू शकतो, तो पक्ष एका महिलेचा वापर करणार नाही का? मला वाटतं भाजपात माझ्या अस्मितेला धोका होता, त्यामुळेच भाजपा सोडून मी आपल्या घरी येत आहे. घरी परत येण्याला प्रवेश म्हणत नाहीत’, असं मलिकाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वीच मलिकाने भाजपा पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी तिने आपल्याला एका स्वच्छ प्रतिमा असलेल्या पक्षाची गरज होती, त्यामुळेच आपण भाजपामध्ये येण्याचा निर्णय घेतला असं सांगितलं होतं.