दहिवडी (सातारा) : ‘शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो, असे पंतप्रधान मोदी म्हणत असताना त्यांचे हे बगलबच्चे शरद पवारांवर टीका करत मस्तवालपणे सत्तेचा गैरवापर करून जनतेची दिशाभूल करत आहेत. या विरोधातच हल्लाबोल मोर्चा काढला जात आहे,’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
माण येथे राष्ट्रवादी पक्षाचा हल्लाबोल मोर्चा आल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत पवार बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, खासदार विजयसिंह मोहिते, आमदार शशिकांत शिंदे, दिलीप चव्हाण, दत्तामामा भरणे, संग्राम कोते, संजीवराजे नाईक-निंबाळकर, तेजस शिंदे, प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, सुरेंद्र गुदगे, चित्राताई वाघ, सभापती रमेश पाटोळे, जिल्हा परिषद सदस्या भारती पोळ, सोनाली पोळ, सुरेखाताई पखाले, कविता म्हेत्रे, संदीप पोळ, सुनील पोळ, युवराज सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, ‘२०१७ च्या विधानपरिषदेसाठी प्रभाकर घार्गे निवडणूक लढवायला नको म्हणाले, मग शरद पवारांनी शेखर गोरेंना उमेदवारी दिली. या सरकारने शेतकºयांची चेष्टा लावली असून, फक्त जाहिरातबाजी मार्केटिंगवर हे सरकार काम करताना दिसून येत आहे.’
माण-खटाव तालुक्यात समज-गैरसमज न करता एकसंघ राहून सर्वांनी बरोबर यावे. जो चांगले काम करेल, त्याचाच विचार केला जाणार असून, शरद पवार हेच या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय घेतील. येणाऱ्या निवडणुकीत पाटण, कऱ्हाड, माण-खटावसह सर्व तालुक्यांतील आमदार व दोन खासदार निवडून आणावेत, असे आवाहनही अजित पवार यांनी केले. सूत्रसंचालन केले तर संदीप पोळ यांनी आभार मानले.